चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक रामाळा तलावात मोठ्या प्रमाणावर झालेल्या मासेमृत्यू प्रकरणाने गंभीर स्वरूप धारण केले असून, या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार प्रतिभा सुरेश धनोरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पत्रात नमूद केल्याप्रमाणे, केंद्र सरकारच्या ‘अमृत 2.0’ अभियानांतर्गत रामाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी सुमारे 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, एवढा मोठा निधी खर्च होऊनही तलावातील पाणी दूषित राहिले असून हजारो माशांचा मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तसेच, सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम 90 टक्के पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात दूषित पाणी तलावात मिसळत असल्याचे चित्र आहे. ‘ऑक्सिडेशन’ आणि ‘वायुवीजन’ यंत्रणांचा वापर केवळ कागदोपत्री दाखवला जात असून, प्रत्यक्षात त्याचा योग्य वापर होत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
तलावातील गाळ काढणे, पाणी शुद्धीकरण करणे आणि कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध असूनही तलावाची स्थिती सुधारलेली नाही. त्यामुळे खर्च झालेल्या निधीचा योग्य वापर झाला का, याबाबत शंका उपस्थित करण्यात आली आहे.
या प्रकरणात निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच, मृत मासे तातडीने हटवून परिसराचे निर्जंतुकीकरण करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी न झाल्यास नागरिकांच्या हितासाठी तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही खासदारांनी दिला आहे.




