चंद्रपुर : इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेत विशेष उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारा ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार’ समाज कल्याण विभागामार्फत प्रदान केला जातो. या योजनेअंतर्गत सन २०२२-२३ व २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांतील पात्र विद्यार्थ्यांना धनादेशाद्वारे पुरस्काराची रक्कम देण्यात आली होती.
मात्र, यापैकी काही विद्यार्थ्यांनी अद्यापही पुरस्काराचा धनादेश बँकेतून वटविलेला नाही. अशा विद्यार्थ्यांची नावे समाज कल्याण विभागाच्या www.acswchandrapur.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
या यादीतील विद्यार्थ्यांनी, यादी प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत वटविण्यात न आलेला धनादेश सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर कार्यालयात जमा करून नवीन धनादेश प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
निर्धारित एक महिन्याचा कालावधी संपल्यानंतर वटविण्यात न आलेली पुरस्काराची रक्कम शासन खात्यात जमा करण्यात येईल. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना पुरस्काराचा धनादेश मिळणार नाही. याबाबत विद्यार्थी स्वतः जबाबदार राहतील, अशी स्पष्ट सूचना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांनी या सूचनेची गांभीर्याने नोंद घेऊन वेळेत आवश्यक कार्यवाही करावी, असेही कळविण्यात आले आहे.




