घुग्घुस (चंद्रपुर): औद्योगिक नगरी घुग्घुसमध्ये नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी मोठी त्रासदायक स्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण शहरात पाण्याची भीषण टंचाई असून नागरिकांना दररोज पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
नगरपरिषदेकडून घरगुती नळांना तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा होतो, तोही अत्यंत कमी दाबाने. विशेषतः बहिरम बाबा नगर भागातील नळांना येणारे पाणी सतत घाणेरडे व दूषित असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दोन महिन्यांपूर्वीच नागरिकांनी नगरपरिषदेच्या लक्षात ही गंभीर समस्या आणून दिली होती, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला आहे.
याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाच्या वतीने, शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली बहिरम बाबा नगर येथील खड्ड्यांमध्ये बेशरमची झाडे लावून नगरपरिषदेचा निषेध व्यक्त करण्यात आला. ही आंदोलनात्मक कृती शहरातील प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार प्रहार ठरली.
या आंदोलनात काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, तालुका सचिव विशाल मादर, सुनील पाटील, दीपक पेंदोर, अभिषेक सपडी, दीपक कांबळे, निखिल पुनघंटी, कपिल गोगला, शहशाह शेख, सूरज मिश्रा, नागेश कुचनकर, मनोज चांदेकर, अंकुश सपाटे आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेसने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा सुरू केला नाही, तर यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल.




