गोंदिया – महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण गोंदिया जिल्ह्यासाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. आयोजित आभासी पत्रकार परिषदेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोंदिया ते बल्लारशाह रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासंदर्भात मंजूर कामांची माहिती दिली.
गोंदिया जिल्हा हा छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेश या तीन राज्यांच्या सीमेला लागून असल्यामुळे व्यापारी आणि औद्योगिक दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. रेल्वे मार्ग दुहेरीकरणामुळे या परिसरातील वाहतुकीला अधिक वेग मिळणार असून, मालवाहतुकीचा वेळ आणि खर्च दोन्ही कमी होण्यास मदत होईल.
या योजनेमुळे स्थानिक रोजगार निर्मितीला चालना मिळणार असून, गोंदिया जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने ही एक महत्वपूर्ण पावले ठरणार आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले की, हे दुहेरीकरण काम लवकरच सुरू होणार असून, यासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर मध्य भारतातील कनेक्टिव्हिटी आणि औद्योगिक विकासाला मोठा हातभार लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
हा प्रकल्प गोंदिया जिल्ह्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




