चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील गोवरी पौनी विस्तार योजनेमुळे प्रकल्पग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या नोकरी व पुनर्वसनाच्या मागण्यांसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रलंबित मागण्यांबाबत त्वरित कार्यवाही व्हावी यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने बैठक घेण्याची मागणी केली आहे.
गोवरी पौनी प्रकल्पामुळे अनेक शेतकरी विस्थापित झाले असून, त्यांची नोकरी व पुनर्वसनासंदर्भातील मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
खासदार धानोरकर यांनी शेतकऱ्यांच्या या समस्या गांभीर्याने घेत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात मुख्य मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये —
प्रलंबित नोकरीसंबंधी फाईल त्वरित मंजूर करणे,
पात्र प्रकल्पग्रस्तांना दोन महिन्यांच्या आत नोकरी देणे,
अधिग्रहित जमिनीच्या ठिकाणीच रोजगार उपलब्ध करणे,
नोकरी मिळेपर्यंत जमीन संपादन प्रक्रिया थांबवणे,
यांसारख्या महत्त्वाच्या मागण्यांचा समावेश आहे.
याशिवाय, नोकरी वाटपात कोणताही भेदभाव न करता सर्व पात्र शेतकऱ्यांना सामावून घेणे, वेकोलीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांशी चर्चा करणे, SOP संदर्भातील मुद्दा रद्द करणे, विरूर (गाडेगाव) येथील सुटलेल्या सर्वे नंबरांचे प्रश्न सोडवणे, मातीच्या ढिगाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देणे आणि सांगोळा येथील विशिष्ट सर्वे नंबर व खाणकामामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर तोडगा काढण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
“प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांचा न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह वेकोलीच्या संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन या समस्यांचे निराकरण केले जाईल,” असे आश्वासन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिले आहे.




