चंद्रपूर : येत्या 15 व 16 ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर येथे आयोजित धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यात चंद्रपूर तसेच इतर जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने अनुयायी सहभागी होणार आहेत. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा होऊन वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक सुरळीत राहावी आणि कोणतीही अनुचित घटना अथवा दुर्घटना घडू नये यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 30(2)(XI), (XVII), (XX) नुसार दिलेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केला आहे की, 16 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर शहरातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये तसेच खाजगी कोचिंग क्लासेस एक दिवस बंद ठेवण्यात यावेत.
तसेच, शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनी अनावश्यक गर्दी कमी ठेवावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष (दूरध्वनी क्र. 07172-250077) येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.




