चंद्रपूर : विद्यार्थी हे आपले दैवत असून, त्यांना चांगले शिक्षण देणे आणि कलागुणांना वाव देणे हे प्रत्येक शिक्षकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. चंद्रपूर जिल्हा परिषदेत आयोजित शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठकीत ते बोलत होते.
शिक्षण मंत्री म्हणाले की, कृत्रिम तंत्रज्ञान आणि ई-माध्यमांच्या युगातही विद्यार्थ्यांची जमिनीशी नाळ तुटू नये, यासाठी अभ्यासक्रमाबरोबरच खेळ, कला यांना महत्त्व देणे गरजेचे आहे. आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच विकासाचे मुख्य साधन आहे.
या बैठकीस आमदार किशोर जोरगेवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नूतन सावंत, विभागीय शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर, शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे, राजेश पाताळे, मुख्य लेखाधिकारी अतुल गायकवाड, विनीत मत्ते आदी उपस्थित होते.
शाळांच्या भौतिक सुविधांसाठी शासन कटिबद्ध आहे. यामध्ये स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह, इमारतींची देखभाल, ई-सुविधा, लॅब, वाचनालय, क्रीडांगण यांचा समावेश आहे. शाळांना अधिक निधी देण्यात येणार असून, सीएसआर फंड व खनिज विकास निधीचा उपयोग करूनही निधी मिळवता येईल.
विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी पालकांच्या उपस्थितीत केली जाणार असून, प्रत्येक विद्यार्थ्याचे हेल्थ कार्ड तयार होईल. याशिवाय इयत्ता 4 थी आणि 7 वी ची शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा सुरू करण्याचेही नियोजन आहे. निपुण शाळा अभियान अधिक जोमाने राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
आमदार किशोर जोरगेवार यांनी शिक्षकांच्या तत्परतेची आणि कल्पकतेची प्रशंसा करताना सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्यात आयडॉल शिक्षकांची संख्या सर्वाधिक असावी, अशी अपेक्षा आहे. तसेच जिल्ह्यातील रिक्त शिक्षक पदे त्वरित भरावीत, अशी मागणी त्यांनी केली.
या बैठकीत शिक्षक दीपक गोतावळे, अविनाश जुमडे, गिरीधर पानघाटे, मोहिनी देशमुख, सविता झाडे, अजय मुसळे, अली अजाणी, शिल्पा ठाकरे, सोनाली चारवळ आदी आयडॉल शिक्षकांनी त्यांच्या उपक्रमांचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे आणि राजेश पातळे यांनी, संचालन विवेक इत्तडवार यांनी तर आभार उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख यांनी मानले.





