अमरावती : शेतकरी, दिव्यांग आणि इतर घटकांच्या विविध मागण्यांसाठी सात दिवसांपासून गुरुकुंज मोझरी येथे सुरु असलेले आमदार बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन अखेर आज मागे घेण्यात आले. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शासनाच्या वतीने लेखी आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज आंदोलनस्थळी भेट देत शासनाच्या वतीने लेखी पत्र दिले. या पत्रात काही मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली. बच्चू कडू यांच्या प्रकृतीचीही त्यांनी विचारपूस केली आणि त्यांच्या आंदोलनाबाबत शासन गंभीर असल्याचे सांगितले.
यावेळी आमदार अमोल मिटकरी, कमलताई गवई आदी मान्यवर उपस्थित होते. याआधी पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे आणि मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी देखील उपोषणस्थळी भेट देत उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले होते.
उपोषण मागे घेतल्यानंतर बोलताना बच्चू कडू यांनी सांगितले की, “कार्यकर्त्यांच्या भावना आणि शासनाच्या लेखी आश्वासनाची दखल घेत आम्ही आंदोलनाची सांगता करीत आहोत.”
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उपोषणकर्त्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले आणि बच्चू कडू यांची प्रकृती ठिक झाल्यानंतर सविस्तर चर्चा करून उर्वरित मागण्यांवर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले.
शासनाने मागण्यांकडे घेतलेली दखल आणि सकारात्मक पावले या आंदोलनाची सकारात्मक परिणती ठरली असून अनेक शेतकरी व दिव्यांग बांधवांच्या न्यायहक्कासाठीचा लढा यशस्वी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.




