चंद्रपूर : आषाढवारीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या वारकरी व भाविकांसाठी राज्य शासनाने दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दि. 13 ते 27 जुलै 2026 या कालावधीत होणाऱ्या आषाढवारी यात्रेसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक खाजगी तसेच प्रवासी वाहनांनी पंढरपूरकडे रवाना होत आहेत. या पार्श्वभूमीवर दि. 6 ते 29 जुलै 2026 या कालावधीत पंढरपूरला जाणाऱ्या व तेथून परतणाऱ्या पात्र वाहनांना मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) टोल नाक्यांवर पथकर (टोल) सवलत देण्यात येणार आहे.
शासनाच्या निर्देशानुसार मानाच्या पालख्या, वारकरी तसेच आषाढवारीसाठी जाणाऱ्या भाविकांच्या पात्र वाहनांची आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून विहित नमुन्यात पथकर सवलत पास (टोल पास) किंवा स्टिकर जारी करण्यात येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील आषाढवारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांनी आपल्या वाहनांची आवश्यक कागदपत्रे घेऊन कार्यालयीन वेळेत प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), चंद्रपूर येथे संपर्क साधावा आणि शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेला टोल सवलत पास अथवा स्टिकर प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे.
तसेच, शासनाच्या या विशेष सवलतीचा जास्तीत जास्त पात्र भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रावसाहेब रागडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
आषाढवारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या भाविकांनी वेळेत टोल सवलत पास मिळवून शासनाच्या या सुविधेचा लाभ घ्यावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




