चंद्रपूर : सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांचे महसुली प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी तसेच अधिकार अभिलेख (7/12 उतारा) अधिक पारदर्शक व अद्ययावत करण्याच्या उद्देशाने महसूल व वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार चंद्रपूर जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अंतर्गत ‘जिवंत 7/12 मोहीम’ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 207 शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यांवरील वारस नोंदी व इतर आवश्यक दुरुस्त्या पूर्ण करून त्यांना अद्ययावत ‘जिवंत 7/12’ चे वितरण करण्यात आले आहे.
महसूल प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या समाधान शिबिरांमधून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले महसुली प्रश्न जागेवरच निकाली काढले जात आहेत. मयत खातेदारांची नावे कमी करणे, कायदेशीर वारसांची नोंद करणे तसेच 7/12 उताऱ्यातील विविध त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना अद्ययावत अभिलेख उपलब्ध करून दिले जात आहेत.
विधानसभा मतदारसंघनिहाय लाभार्थी
- चंद्रपूर – 17
- बल्लारपूर – 36
- ब्रह्मपुरी – 41
- चिमूर – 50
- वरोरा – 40
- राजुरा – 23
टप्पा 1 अंतर्गत प्रमुख सेवा
- मयत खातेदारांची नावे कमी करून कायदेशीर वारसांची नोंद.
- गावागावांत चावडी वाचन करून प्रलंबित वारस नोंदींचे अर्ज स्वीकारणे व पडताळणी.
- ऑनलाइन प्रणालीद्वारे वारस नोंदींचे फेरफार जलदगतीने व विनामूल्य मंजूर करणे.
टप्पा 2 अंतर्गत प्रमुख सेवा
- सज्ञान (18 वर्षे पूर्ण) झालेल्या खातेदारांच्या 7/12 वरील अपाक शेरा ई-हक्क प्रणालीद्वारे काढणे.
- संयुक्त कुटुंब व्यवस्थापकाची नोंद कमी करून सर्व सह-खातेदार व कायदेशीर वारसांची भोगवटादार म्हणून नोंद.
- शासनाने माफ केलेल्या जुन्या तगाई कर्जांचे उर्वरित बोजे 7/12 वरून कमी करणे.
- कृषी व मृदसंधारण विभागाचे माफ केलेले जुने बंडींग/आयकट बोजे हटविणे.
- परतफेड झालेले किंवा कालबाह्य उसनवारी व सावकारी कर्जाचे बोजे नियमानुसार कमी करणे.
प्रशासनाचे आवाहन
ज्या शेतकरी किंवा नागरिकांच्या कुटुंबातील मयत खातेदारांच्या वारस नोंदी, कालबाह्य नोंदी अथवा इतर महसुली दुरुस्त्या अद्याप प्रलंबित आहेत, त्यांनी संबंधित तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा ई-हक्क प्रणालीद्वारे ऑनलाइन अर्ज करून शासनाच्या ‘जिवंत 7/12’ मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.




