महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ आणि पक्षीप्रेमींसाठी नंदनवन मानल्या जाणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात १ मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर ‘निसर्ग अनुभव’ अंतर्गत प्राणीगणना उपक्रम पार पडला. उपवनसंरक्षक कृष्णा भवर आणि सहाय्यक वनसंरक्षक हेमंत उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही गणना करण्यात आली.
या प्राणीगणनेदरम्यान एकूण १५ वन्यजीवांची नोंद करण्यात आली. त्यामध्ये आठ सोनेरी कोल्हे, तीन राज मांजर, एक तरस, एक मुंगूस आणि दोन रान ससे आढळल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.
वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने तसेच अभयारण्यात असलेल्या जैवविविधतेचा आढावा घेण्यासाठी अशा प्रकारच्या गणना अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. या उपक्रमामुळे वन्यजीवांच्या अस्तित्वाची अचूक माहिती मिळून त्यांच्या संरक्षणासाठी योग्य उपाययोजना आखण्यास मदत होणार असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.




