घुग्घुस, चंद्रपूर : भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस व यशोधरा महिला मंडळाच्या वतीने वर्षावास निमित्ताने दर बुधवार प्रवचन मालिका राबवली जात आहे. दिनांक 23 जुलै 2025 रोजी आयोजित प्रवचनात बौद्ध महासभा नगर शाखेचे अध्यक्ष सुरेश पाईकराव यांनी बौद्ध अनुयायांनी मयतविधीप्रसंगी कोणते अंधश्रद्धापूर्ण व चुकीचे प्रकार टाळावेत, याबाबत मार्गदर्शन केले.
सुरेश पाईकराव यांनी उपस्थित बौद्ध बांधवांना मयतविधीच्या वेळी खालील नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले :
शव स्मशानभूमीकडे नेताना वाटेत कुठेही शव ठेवू नये.
शवावर काळी किंवा ‘धम्म काळी’ म्हणून वस्तू टाकू नयेत.
अस्थी विसर्जनाच्या वेळी जेवण, दहीभात इत्यादी अन्नपदार्थ घेऊन जाऊ नयेत.
अस्थी नदीत विसर्जित करू नये; गढा करून झाड लावावे.
तिसऱ्या दिवसाचे जेवण स्मशानभूमीत नेऊ नये.
मृत व्यक्तीस एकच नवीन कपडा द्यावा; इतर कपडे गरजूंसाठी दान करावेत.
शव समोर पुजाविधीसाठी ताट, मेणबत्ती, अगरबत्ती घेऊन जाऊ नये.
शव नेताना ‘पुढे बघा, मागे पाहू नको’ असे सांगू नये.
मृत व्यक्तीस दारू, बीडी, सिगारेट इत्यादी ठेवू नयेत.
कपाळाला अष्टगंध, हाताला पांढरा दोरा बांधू नये.
पती मयत झाल्यास पत्नीच्या हातातील बांगड्या, कुंकू पुसू नयेत.
शवावर पैसे टाकू नयेत.
“वरील नियमांचे पालन केल्यास अंधश्रद्धा टाळता येईल व धम्माच्या मूळ तत्वांनुसार आचरण करता येईल,” असे मतही पाईकराव यांनी मांडले. कार्यक्रमाचे संचालन लता धोटे यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्या दुबे यांनी केले.
कार्यक्रमावेळी कार्याध्यक्ष चंदगुप्त घागरगुंडे, केंद्रीय शिक्षिका उज्ज्वला तोडेकर, माया सांड्रावार, कोषाध्यक्ष वैशाली निखाडे, यशोधरा महिला मंडळाच्या अध्यक्षा रीता देशकर, तसेच रजनी जिवने, सुनंदाबाई सोंडुले, सुषमा धोटे, यशोधराबाई मस्के, किरण पाईकराव, साक्षी जिवने, शिल्पा सोंडुले, ज्योती बेंडले, अल्का करमणकर, माधुरी करमणकर, बबन वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.





