नागरिकांनी विहीत नमुन्यात तक्रारी सादर करण्याचे आवाहन
चंद्रपूर : सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी व तक्रारींचे तातडीने निवारण करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय तर तिसऱ्या सोमवारी तालुका स्तरावरील लोकशाही दिनांचे आयोजन करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर, ऑगस्ट महिन्याचा पहिला सोमवार 4 ऑगस्ट 2025 रोजी येत असल्याने जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे करण्यात येणार आहे.
या लोकशाही दिनात नागरिकांनी आपल्या तक्रारी सादर करताना विहीत नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत संलग्न करावी, तसेच 15 दिवस आधी दोन प्रतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. याशिवाय, तक्रार किंवा निवेदन हे वैयक्तिक स्वरुपाचे असणे बंधनकारक आहे. या निकषांची पूर्तता झाल्यानंतरच तक्रार अर्ज स्वीकारण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या अडचणी व समस्या सोडवण्यासाठी या लोकशाही दिनाच्या माध्यमाचा योग्य वापर करावा.





