विदर्भात उन्हाचा तडाखा वाढत असून, अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवत आहे. अकोला, यवतमाळ आणि चंद्रपूर येथे उष्णतेसाठी ऑरेंज अलर्ट, तर अमरावती, वर्धा आणि नागपूरसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नागपुरात कमाल तापमान 41.1 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले, तर चंद्रपूर येथे सर्वाधिक 41.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वर्ध्यात 41 अंश, अकोल्यात 41.5 अंश तापमान नोंदवण्यात आले.
नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या २४ तासांत अमरावती, नागपूर आणि वर्धा येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. नागरिकांनी गरजे शिवाय उन्हात बाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.