नागपूर : ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवसखी सरस महोत्सवाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हा महोत्सव साउथ सेंट्रल झोन कल्चरल सेंटरच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.
उद्घाटनप्रसंगी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन (IAS) तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध स्टॉलना भेट देत महिला उद्योजिकांनी तयार केलेल्या उत्पादनांची माहिती घेतली आणि काही पदार्थांची चव चाखत महिला बचत गटांच्या कार्याचे कौतुक केले.
महिला बचत गटांच्या उत्पादनांचे आकर्षण
या महोत्सवात महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यात
मसाले आणि खाद्यपदार्थ – मिरची पावडर, मसाला, हळद पावडर, लोणची, पापड, डाळ.
हस्तकला आणि गृह सजावट – मातीची भांडी, बॅग, साड्या, ज्वेलरी, गारमेंट्स, हर्बल प्रोडक्ट्स.
खाद्य मेजवानी – स्वादिष्ट शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसह झुणका भाकर, पुरणपोळी.
नाश्त्याचे स्टॉल – पोहे, चकली, कच्चा चिवडा, मोमोज, साबुदाणा वडे, बटाटेवडे, पाणीपुरी, दाबेली, इडली, अप्पे, ढोकळा, समोसा, गव्हाचे लाडू, मटका रोटी इत्यादी.
महिला सक्षमीकरणाचा अनोखा उपक्रम
महिला बचत गटांना स्वतःच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी आणि ग्रामीण भागातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी नवसखी सरस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात सहभागी झालेल्या महिलांनीही समाधान व्यक्त केले आणि अशा उपक्रमांमुळे त्यांना आर्थिक स्थैर्य मिळत असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या कौशल्याचे कौतुक करत अशा प्रकारच्या उपक्रमांना सरकारकडून पुढेही पाठिंबा मिळेल, असे आश्वासन दिले. नागरिकांचा देखील या महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळत असून, नागपूरकरांनी पारंपरिक आणि ग्रामीण उत्पादने मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे.
नवसखी सरस महोत्सवामुळे महिला बचत गटांना व्यवसायाची नवीन संधी उपलब्ध होत असून, हा उपक्रम महिलांच्या सशक्तीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरणार आहे.