नागपूर: नागपूर येथे आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) ५३व्या प्रांत अधिवेशनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटक म्हणून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत प्रेरणादायी भाषण केले. संघर्ष आणि नेतृत्व याचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी विद्यार्थी परिषदेच्या कार्याचे कौतुक केले आणि संघटनेच्या राष्ट्रवादी विचारधारेवर भर दिला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “संघर्ष म्हणजे काय, हे मी विद्यार्थी परिषदेच्या कामातून शिकलो. सामान्य विद्यार्थ्यांमध्ये असामान्य गुण निर्माण करण्याचे कार्य विद्यार्थी परिषद यशस्वीपणे करत आहे. आज मी येथे मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर एक जुना कार्यकर्ता म्हणून उभा आहे.”
त्यांनी सांगितले की अभाविप मागील अनेक दशकांपासून शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडवून राष्ट्रवादी विचारसरणीला प्रोत्साहन देत आहे. मात्र, आज काही शक्ती माओवादी विचारसरणीला पुन्हा प्रचारित करण्याचा प्रयत्न करत असून त्यांची वाटचाल अराजकतेकडे असल्याचे त्यांनी नमूद केले. “कॉलेज कॅम्पसचा वापर करत या विचारांचे प्रदूषण पसरवले जात आहे, मात्र हे थांबवून राष्ट्रवादाचे बीजारोपण करणे आपले कर्तव्य आहे,” असे आवाहनही त्यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना देशभक्ती, नेतृत्वगुण, आणि राष्ट्रहितासाठी काम करण्याचा संदेश दिला. “अभाविप ही केवळ एक विद्यार्थी संघटना नसून ती राष्ट्र उभारणीची चळवळ आहे,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या समारोपाला विविध मान्यवरांची उपस्थिती होती, तसेच अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.




