चंद्रपूर : जिल्ह्यात अंमली पदार्थ सेवन, वापर व विक्रीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण करण्यात आले असून याबाबत जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी आज (दि.28/04/2026) समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितीन धार्मिक, शिक्षणाधिकारी राजेश पाताळे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, आजची तरुण पिढी व्यसनाकडे जाण्याची शक्यता असल्यामुळे महाविद्यालयांमध्ये विशेष लक्ष ठेवावे. तसेच जिल्ह्यात कुठेही अंमली पदार्थाची विक्री, साठवणूक व वापर होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. बाहेरुन येणारे टपाल स्कॅनरने तपासणे आवश्यक आहे. 16 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत अवगत करावे. तसेच शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर कार्यशाळा घ्याव्यात. जिल्ह्यात अंमली पदार्थाची आवक, विक्री आदी माहिती मिळण्यासाठी पोलिस विभागाने खब-यांचे नेटवर्क वाढवावे, अशा सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
विविध विभागांनी करावयाची कार्यवाही : शिक्षण विभागाने शाळा महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये अंमली पदार्थ, दारू, तंबाखुचे सेवन होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. तसेच अंमली पदार्थ प्रतिबंधाबाबत निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, पथनाट्य, रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करावी. सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील सुरू व बंद असलेल्या कारखान्यांची तसेच मेडीकल स्टोअर्सला अचानकपणे भेट देऊन अवैधरित्या होणा-या ड्रग्ज विक्रीची तपासणी करावी. जिल्ह्यात शेतांमध्ये खसखस किंवा गांजाची लागवड होणार नाही, याबाबत कृषी विभागाने दक्षता घ्यावी. अंमली पदार्थ सेवन करून रुग्णालयात आलेल्या रुग्णांची माहिती आरोग्य विभागाने त्वरीत पोलिस प्रशासनाला द्यावी. टपालाद्वारे येणा-या पार्सलमध्ये काही अंमली पदार्थाबाबत संशय आल्यास टपाल विभाग व प्रादेशिक परिवहन कार्यालयाने त्याची सूचना पोलिसांना द्यावी. सर्व ठाणेदारांनी खाजगी कुरीअर एजन्सीसोबत संपर्क ठेवून अंमली पदार्थाच्या वाहतुकीबाबत माहिती प्राप्त करून घ्यावी.
पोलिस विभागाने अंमली पदार्थ बाळगणा-यांवर वेळोवेळी धाडी टाकाव्यात. तसेच अंमली पदार्थ सेवन करणा-यांविरुध्द कडक कारवाई करावी. एमआयडीसी परिसरातील बंद कारखान्यांची पाहणी करून तेथे अंमली पदार्थ उत्पादित होत नाही, याची खात्री करावी. रेल्वे विभागाने तेलंगणा व इतर राज्यातून संशयित रेल्वे प्रवाशांच्या सामानाची तसेच बेवारस सामानांची पडताळणी करून योग्य कारवाई करावी.




