चंद्रपूर | जनसुरक्षा विधेयकविरोधात राज्यभरात निर्माण झालेल्या तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातही जनसुरक्षा विधेयक विरोधी कृती समिती सक्रिय झाली आहे. समितीच्या वतीने दिनांक 22 जुलै रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडे जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र विधानसभेत सरकारने बहुमताच्या जोरावर जनसुरक्षा विधेयक पारित केले असून, देशात सध्या गरीबी, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, आदिवासी विकास, कृृषी, शेतकरी प्रश्न, जलसंवर्धन अशा महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून हे विधेयक लादले जात आहे.
समितीने असा इशारा दिला आहे की या विधेयकामुळे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येईल, तसेच आंदोलन करणाऱ्यांवर कठोर कारवाई शक्य होईल. सामाजिक कार्यकर्ते, आंदोलक, पत्रकार, विद्यार्थी, आदिवासी, आणि अल्पसंख्याक समाजांवर अन्याय होण्याची शक्यता असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
चंद्रपूर शहरातील विविध घटकांच्या वतीने आंदोलकांनी विधेयकाला आक्षेप घेतला असून, जनतेच्या भावना व लोकशाहीच्या रक्षणासाठी राज्यपालांनी हस्तक्षेप करून हे विधेयक रद्द करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.





