गडचिरोली – जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांची वेळ १ एप्रिलपासून सकाळी ७.१५ ते दुपारी १.४५ अशी करण्यात आली आहे. मात्र, सध्या वाढलेले तापमान आणि येत्या महिन्यात होणारी अधिकची उष्णता लक्षात घेता ही वेळ बालकांच्या आरोग्यासाठी योग्य नसल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. अमोल मारकवार यांनी प्रशासनाला वेळेत बदल करण्याची मागणी केली आहे. वाढत्या उन्हामुळे लहान बालकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे अंगणवाडी केंद्रांची वेळ सकाळी लवकर आणि दुपारच्या कडाक्याच्या उन्हापूर्वीच संपवावी, असे त्यांनी सुचविले.
गडचिरोलीतील उन्हाळ्यातील तापमानाचा विचार करता, लहान बालकांच्या सुरक्षिततेसाठी हा बदल त्वरित करण्यात यावा, अशी आग्रही मागणी केली जात आहे.