मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी करावयाच्या सोयी- सुविधांचा आढावा एकनाथ संभाजी शिंदे यांनी घेतला. या बैठकीस माजी उपमुख्यमंत्री हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमी येथे येतात. त्यांना भोजन, स्वच्छ आणि पुरेशी स्वच्छतागृहे, वैद्यकीय सुविधा, राहण्याची सुविधा, वाहतूक व्यवस्था, मदत आणि समन्वय कक्ष, सुरक्षा आदी सोयी-सुविधा पुरविण्यात येतात. या पुरविताना कोणत्याही अनुयायाची गैरसोय होणार नाही, याची सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी, त्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुटी जाहीर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
माजी उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की, दरवर्षी आपण चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करतो. यावर्षीही सुद्धा कोणतीही कमतरता राहणार नाही, याची काळजी घ्यावी. सर्वानी समन्वयाने प्रयत्न करावेत. भोजन, आरोग्य, पाणी, स्वच्छता तसेच सुरक्षा आदी सुविधा दर्जेदार द्यावेत. स्थानिक समित्यांचे नेहमीच सहकार्य राहते. त्यांच्या सूचनांही योग्य प्रकारे अमंलात आणाव्यात. अनुयायी संवेदना व्यक्त करायला येतात. संवेदनशीलता ठेवून शासनाच्या माध्यमातून चांगल्या प्रकार नियोजन करावे, अशा सूचना देऊन श्री. फडणवीस यांनी यावेळी विविध सुविधांची माहिती घेतली आणि त्याबाबतच्या नियोजनाबाबत समाधानही व्यक्त केले.
मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्यासह विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.




