जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
चंद्रपूर : मार्च ते 15 जून 2024 पर्यंतच्या कालावधीत संभाव्य उष्मालाटेच्या सौमीकरण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी सज्ज राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने सर्व संबंधित विभाग प्रमुखांची उष्मालाट व्यवस्थापन संदर्भात पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा आरोग्य अधिकारी अशोक कटारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.यु.एस. हिरुडकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सलीम शेख आदी उपस्थित होते.
आरोग्य विभागाने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात व रुग्णालयांमध्ये कुल वॉर्ड तयार करावे. तसेच उन्हापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी गौडा यांनी केले. प्रास्ताविक करताना निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार म्हणाले, उष्णतेच्या लाटेची पूर्वतयारी कशी करावी व जनतेने उष्मघातापासून बचाव करण्यासाठी काय करावे व काय करू नये या संबंधित मार्गदर्शन केले. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनारकर यांनी उष्णतेच्या लाटेसंदर्भातील परिभाषा, पूर्वसूचना, निकष, पूर्वसूचना प्रणाली, पूर्वानुमान याबाबत मार्गदर्शन केले.
संभाव्य उष्णतेच्या लाटेसंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना निर्गमित :
उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी खालील उपाययोजना कराव्यात.
काय करावे :
तहान लागली नसली तरी सुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलकी, पातळ व सछिद्र सुती कपडे वापरावे. बाहेर जाताना गॉगल, छत्री, टोपी, बूट व चप्पलचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत न्यावी. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस., घरी बनवलेली लस्सी, तोरणी, लिंबू पाणी, ताक इत्यादीचा वापर करावा.