यवतमाळ : जिल्हास्तरीय युवा महोत्सव हे युवक-युवतींच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय व कृषी आयुक्तालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयद्वारा आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दि.३ डिसेंबर रोजी अमोलकचंद महाविद्यालयात करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, प्रमुख पाहुणे म्हणून अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य मिश्रा, जिल्हा कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे, कृषी उपसंचालक चव्हाण, सह्याद्री करियर फोरम मुंबईचे संचालक डॉ.तुषार घोरपडे उपस्थित होते.
पालकमंत्री संजय राठोड यांनी युवा महोत्सवाविषयी बोलताना म्हटले की, या महोत्सवात विविध कलाप्रकार जसे की लोकगीत, लोकनृत्य, वक्तृत्व, कथालेखन, निबंध लेखन, रांगोळी, पाककला आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांच्या माध्यमातून हा महोत्सव युवक-युवतींच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ असल्याचे सांगितले. संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये तृणधान्याचे असलेले महत्व त्यांनी विशद केले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी महोत्सवात सहभागी सर्व युवक युवतींना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी संजय पांडे केले. संचलन अनंत पांडे यांनी केले तर आभार क्रीडा अधिकारी चैताली राऊत यांनी मानले.
युवा महोत्सवाच्या स्पर्धा आयोजनाची जबाबदारी क्रीडा अधिकारी महेश पडोळे यांनी पार पाडली. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी कल्याणी रत्नपारखी, कनिष्ठ लिपिक, रवींद्र पाळेकर, विश्राम कुंभलकर, अभय धोबे, मनीष डोळसकर, योगेश देशमातुरे यांनी परिश्रम घेतले.
या महोत्सवातील स्पर्धेसाठी प्रेम निनगुरकर, दिपाली अग्निहोत्री, अरूणा फुलमाळी, प्रिती नांदुरकर, मनिषा ढोणे, आकाश शिवणकर, सुनिल गुल्हाणे, दिपक जयस्वाल, स्वाती भगत, अनंत पांडे, अविनाश जोशी, किरण फुलझेले, विक्रम ठाकरे इत्यादींनी विविध स्पर्धांच्या पंचांनी मोलाची भुमिका बजावली.