गडचिरोली | कुरखेडा उपविभागांतर्गत येणाऱ्या नान्ही रेतीघाटातून नियमांचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उत्खनन झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी सहा सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समितीची नियुक्ती केली असून, समितीला सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सन २०२५–२६ या आर्थिक वर्षासाठी कुरखेडा उपविभागातील नान्ही आणि कुंभीटोला या रेतीघाटांचा ई-लिलाव करण्यात आला होता. या लिलावात देवरी येथील ‘तारामंगल एजन्सी’ यांनी सर्वोच्च बोली लावत दोन्ही रेतीघाट मिळवले होते. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने ११ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृत मंजुरी आदेशही जारी केला होता.
मात्र, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच नान्ही रेतीघाटातून मोठ्या प्रमाणावर शेकडो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन झाल्याचे समोर आले आहे. या संदर्भात स्थानिक रहिवाशांनी १५ डिसेंबर रोजी तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कुरखेडा येथील तहसीलदारांनी सादर केलेल्या प्राथमिक अहवालात अंदाजे ६०० ब्रास रेतीचे अवैध उत्खनन झाल्याची गंभीर बाब निदर्शनास आली.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी समिती गठित केली असून, अवैध उत्खननास जबाबदार असणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चौकशी अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.




