मौदा : जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मौदा तालुक्यातील नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या जनसंवादात निराधार, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आदी विविध घटकांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडल्या.
रस्ते, रोजगार, शेतजमिनीवरील अतिक्रमण, घरकुल योजना, पाणी समस्या, आरोग्य सेवा, क्रीडा, सांस्कृतिक आणि धार्मिक विषयांवर नागरिकांनी आपली मते मांडली. प्राप्त निवेदनांचा स्वीकार करत पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
विशेषतः आरोग्य समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचा आदेश देत काही अर्ज तत्काळ मार्गी लावण्यास सांगितले. प्रशासनाने नागरिकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
पालकमंत्र्यांच्या या थेट संवादातून नागरिकांना आपल्या अडचणी मांडण्याची संधी मिळाली असून, त्यांच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी सकारात्मक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा आहे.




