भद्रावती तालुक्यात अवैध रेती वाहतुकीला बसणार चाप
चंद्रपूर (प्रतिनिधी) : भद्रावती तालुक्यात अवैध रेती तस्करीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने कठोर पावले उचलली असून, तहसीलदार भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध वाहतुकीविरोधात मोठी मोहीम राबवण्यात आली आहे.
गेल्या तीन महिन्यांत एकूण २७ अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, त्यापैकी २१ वाहनधारकांकडून तब्बल २७ लाख १३ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. उर्वरित ६ वाहनधारकांकडून दंड वसुलीची प्रक्रिया सुरू आहे.
जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये हायवा ट्रक आणि ट्रॅक्टर यांचा समावेश आहे. हे वाहनधारक पिपरी, कोंढा नाला, बिजोनी तसेच इतर नाल्यांतून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने रात्रीच्या वेळी रेती तस्करी करत होते. या वाहनांच्या जोरदार आवाजामुळे परिसरातील नागरिकांच्या झोपेवर परिणाम होत होता, तसेच अवजड वाहनांमुळे रस्त्यांचीही मोठी दुरवस्था झाली होती.
तहसीलदार भांडारकर यांच्या कारवाईमुळे केवळ रेती तस्करीला चाप बसला नाही, तर शासनाच्या महसूलातही भर पडली आहे. विशेष म्हणजे रेती तस्करांकडून वापरले जाणारे नवीन तंत्रज्ञानही यावेळी उघडकीस आले असून, ते मोडीत काढण्यात प्रशासन यशस्वी ठरले आहे.
मात्र, या कारवाईमुळे रेती माफियांना चांगलाच धक्का बसला असून, ते तहसील प्रशासनावर खोटे आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. असे असले तरी तहसीलदार भांडारकर यांनी आपली कार्यतत्परता व कठोर धोरण कायम ठेवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
“अवैध रेती तस्करीवर कठोर कारवाईच हाच एकमेव उपाय असून, प्रशासनाने असेच धाडसी पाऊल पुढेही उचलावे,” असे जनतेचे म्हणणे आहे.




