नागपूर : मनीषनगर येथील बहुप्रतीक्षित रेल्वे अंडर ब्रिज (आरयूबी)चे बांधकाम पूर्ण झाले असून, त्याचे उदघाटन उद्या, २८ जानेवारी २०२५ रोजी, संध्याकाळी ६.३० वाजता होणार आहे. हा सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उदघाटन सोहळ्यानंतर लगेचच हा मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात येईल.
३३.८३ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
या प्रकल्पासाठी ३३.८३ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. आरयूबीची लांबी १९० मीटर, रुंदी ८ मीटर आणि उंची ४ मीटर आहे. हा अंडर ब्रिज मुंबई-हावडा आणि दिल्ली-चेन्नई या व्यस्त रेल्वे मार्गांवर बांधण्यात आला आहे. पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र पादचारी मार्गही या आरयूबीमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.
मनीषनगरवासीयांना मिळणार मोठा दिलासा
या अंडर ब्रिजच्या माध्यमातून मनीषनगर आणि वर्धा मार्ग यांच्यात चांगली कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे. मनीषनगर, बेसा, घोगली आणि बेलतरोडी येथील लाखो रहिवाश्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. रेल्वे फाटकांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा आणि जामचा त्रास संपेल. नागरिकांना अखंड वाहतुकीचा आनंद मिळेल, तसेच वेळेचीही बचत होईल.
आरयूबीमुळे परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात सुगमता येईल, तसेच वर्धा मार्गावर सहज प्रवेश मिळवणे शक्य होईल. नागपूर शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.




