परसबाग असावी दारी कार्यक्रमाचे आयोजन
नागपूर : ऑगस्ट क्रांतीदिन आणि नागपंचमीचे औचित्य साधून मनिष नगर, नागपूर येथे थेट चौथ्या मजल्यावर वसंतराव नाईक यांच्या नावाने आरोग्यदायी परसबाग फुलली, फळली आणि बहरली आहे आणि त्याच ठिकाणी परसबाग असावी दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नागपूर नगरीचे नाईक आत्माराम चव्हाण तर उदघाटक कारभारी अॅड. बद्रीप्रसाद चव्हाण होते. या कार्यक्रमात भारतातील सुप्रसिद्ध साहित्यिक याडीकार पंजाब चव्हाण यांचे त्यांनी शासकीय सेवेत राहून केलेले मोलाचे योगदान आणि सेवानिवृत्ती नंतर सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात केलेले भरीव कार्य,राजकीय विश्लेषकण कार्य, थेटभेट सदर लक्षात घेवून आणि नुकतिच प्रकाशित झालेली आणि अल्पावधीत जनसामान्यांचे चर्चेचा विषय ठरलेली महत्वपूर्ण माहीतीपूर्ण उपयोगी साहित्यकृती “लोकनायक वसंतराव नाईकसाहेब, या पुस्तकाचा विचार करून वसंत बहार ऍग्रोटेक द्वारा वसंत यौद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समग्रक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत बहारचे श्रीपत राठोड यांनी केले. या प्रसंगी व्हिजन इडिया प्रतिष्ठानच्या जयश्री राठोड यांच्या सुमधुर आवाजातील परसबाग निर्माण गिताने सर्वांची मने जिंकली हे विशेष. याप्रसंगी अॅड. बद्रीप्रसाद चव्हाण, जेष्ठ कार्यकर्ते दुलसिंग राठोड, सामाजिक कार्यकर्ते अशोक पवार, गोरशिकवाडीचे प्रेमचंद राठोड, उच्चशिक्षित महीला डॉ.प्रा.कल्पना पवार, बंजार पुकारचे प्रतिनिधी संजू राठोड, खरबीचे नायक पिरूसिंग राठोड यांचे समयोचित भाषण झाले. शेवटी अध्यक्षिय समारोप झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिपाली राठोड यांनी केले तर अंजली राठोड यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.




