मुंबई : पंतप्रधान Narendra Modi यांनी केलेल्या पेट्रोल व डिझेल बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्राचे राज्यपाल Jishnu Dev Varma यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मर्यादित संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि ऊर्जा बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यपालांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
या संदर्भात राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांना पत्र पाठविले आहे. या पत्रामध्ये राज्यपालांच्या सुरक्षेचा सर्वंकष आढावा घेऊन ऊर्जा बचतीच्या अनुषंगाने वाहनांची संख्या निश्चित करण्याबाबत राज्यपालांच्या सूचना कळविण्यात आल्या आहेत.
राज्यपालांनी घेतलेल्या या निर्णयामुळे इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि शासकीय यंत्रणेमध्ये संसाधनांचा काटकसरीने वापर करण्याचा संदेश दिला जात असल्याची चर्चा प्रशासनात सुरू आहे. तसेच शासनाच्या विविध विभागांनीही ऊर्जा बचतीसाठी अशाच प्रकारचे उपाय अमलात आणावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




