मुंबई : मराठवाड्यातील पूरस्थिती आणि राज्यातील विविध धरणांचा विसर्ग याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी जलसंपदा विभागाशी संवाद साधून सविस्तर आढावा घेतला. काल रात्री उशिरापर्यंत त्यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवले होते.
जायकवाडी धरण : सध्या 1,88,000 क्युसेक इतका विसर्ग सुरु असून, पाऊस थांबल्यामुळे विसर्ग वाढविण्याची गरज नाही. हे पाणी आज रात्री 8 वाजेपर्यंत नांदेडपर्यंत पोहोचणार आहे. जिल्हाधिकारी आणि प्रशासन यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
येलदरी धरण : 29,400 क्युसेक इतका विसर्ग होत असून, तो पूर्णपणे नियंत्रणात आहे. मांजरा व तेरणा नद्यांचा पूर आता ओसरला आहे.
पश्चिम महाराष्ट्र : उजनी धरणातून 75,000 क्युसेक आणि सीना-कोळेगावमधून 80,000 क्युसेक विसर्ग सुरु आहे. स्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने कळवले.
नाशिक विभाग : गंगापूर धरणातून 11,000 क्युसेक आणि मुळा धरणातून 10,000 क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे. जायकवाडी धरणासह नाशिक-नगर भागातील धरणांतून होणारा एकूण विसर्ग 87,000 क्युसेकवरून 68,000 क्युसेकवर आणण्यात आला आहे.
जळगाव जिल्हा : गिरणा धरणातून 54,500 क्युसेक आणि हतनूर धरणातून 65,800 क्युसेक विसर्ग सुरु आहे.
कोकण विभाग : सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली असून, धोका नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सर्व संबंधित जिल्ह्यांचे प्रशासन सतर्क आहे आणि राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे.





