चंद्रपूर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्ह्यात ५ फेब्रुवारी रोजी व्यापक महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात नागरिक, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. गावागावांत हातात झाडू घेऊन ग्रामस्थांनी स्वच्छतेचा संकल्प पूर्ण केला.
चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) नूतन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ, पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येऊन गावातील सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, शाळा आणि इतर परिसर स्वच्छ केला.
या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या, गटविकास अधिकारी आणि ग्रामस्तरावरील कर्मचाऱ्यांनी सक्रीय सहभाग घेतला. एकाच दिवशी जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे सार्वजनिक परिसर स्वच्छ करण्यात यश आले, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी दिली.
या अभियानामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील गावे अधिक स्वच्छ आणि सुंदर होण्यास मदत होईल, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. प्रशासनाने असे उपक्रम नियमितपणे राबवावेत, अशी मागणीही नागरिकांनी केली.




