चंद्रपूर जिल्ह्यात खनिज विकास निधीतून विविध महत्त्वाचे उपक्रम राबवले जात असून यात कॅन्सर हॉस्पिटल, कौशल्यावर आधारित रोजगार, आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांचा समावेश आहे. या उपक्रमांमुळे चंद्रपूर आणि गडचिरोली परिसर इंडस्ट्रियल मॅग्नेट म्हणून विकसित होत असून औद्योगिक प्रगतीमुळे समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुल (जि. चंद्रपूर) येथील विश्रामगृहात जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. या वेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री व पालकमंत्री डॉ. अशोक उईके, आमदार सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हा खनिकर्म अधिकारी रोहन ठवरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
“खनिज उत्खननामुळे त्रास सहन करणाऱ्या स्थानिकांना सर्वाधिक लाभ मिळणे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे. त्यामुळे रोजगार निर्मिती, आरोग्य सेवा, शिक्षण व कौशल्य विकास या क्षेत्रात स्थानिकांना प्राधान्य दिले जात आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
चंद्रपूर आणि गडचिरोली येथे औद्योगिक विकासामुळे दीड लाखांहून अधिक रोजगार निर्माण होणार असून 100 टक्के स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी हमी त्यांनी दिली. पर्यावरणाचे संतुलन राखून विकास साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. यापूर्वी 50 कोटी वृक्षलागवड मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली असल्याचे सांगून, आता महाराष्ट्राचे वनक्षेत्र 33 टक्क्यांच्या वर नेण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी केले तर आभारप्रदर्शन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी मानले.





