25 एप्रिल रोजी होणार शुभारंभ; सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन
चंद्रपूर : इरई नदीचे खोलीकरण व पुनरुज्जीवन करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने मोठा उपक्रम हाती घेतला आहे. येत्या 25 एप्रिलपासून या अभियानाचा शुभारंभ होणार असून, हे अभियान लोकचळवळ बनावे यासाठी सर्वांनी यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री व चंद्रपूरचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.
इरई नदी ही चंद्रपूर शहराला समांतर 9 किलोमीटरपर्यंत वाहते आणि वर्धा नदीशी संगमापर्यंत तिचे एकूण अंतर 17 किलोमीटर आहे. या संपूर्ण नदीपात्रातील वाढलेली झाडे-झुडपे, गाळ काढून खोलीकरण, रुंदीकरण व पूरवहन क्षमता वाढवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या अभियानासाठी वन अकादमीत नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीस आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ. उईके यांनी सांगितले की, “हे अभियान जनतेचे आहे, प्रत्येकाने हे आपले मानून योगदान द्यावे. प्रशासनानेही यासाठी योग्य नियोजन करावे. नदीकाठावरील अतिक्रमण हटवण्यासाठी प्रभावी धोरण राबवावे आणि भविष्यात कोणतीही नवीन अतिक्रमणे होणार नाहीत, यासाठी कठोर अंमलबजावणी व्हावी.”
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी डब्ल्यूसीएल व सीटीपीएस या संस्थांनी साहित्य व आर्थिक स्वरूपात सहकार्य करावे, अशी सूचना केली. तसेच नदीतून निघणारा गाळ खोलगट भागात टाकून मैदान निर्माण करण्याचा विचार मांडला. तसेच पाच वर्षांचा व्यापक कार्यक्रम आखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले की, “या अभियानांतर्गत सुमारे पाच लाख ब्रास गाळ काढण्याचे उद्दिष्ट असून, हे काम 45 दिवसांत पूर्ण करणे अपेक्षित आहे. निघणारा गाळ शेतकऱ्यांना मोफत दिला जाईल आणि वाळू घरकुल लाभार्थ्यांना दिली जाईल.”
शासनाच्या वतीने सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार या उपक्रमासाठी देण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
इरई नदी पुनरुज्जीवन अभियान हे केवळ पर्यावरण संवर्धनाचे नव्हे तर चंद्रपूर शहराच्या सुरक्षिततेचेही पाऊल असून, जनतेच्या सहकार्याशिवाय हे शक्य नसल्याचे मत सर्व स्तरावरून व्यक्त होत आहे.




