गडचिरोली : जिल्ह्यात राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले. “दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ कोणतेही काम प्रलंबित राहू नये,” असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीला जिल्हाधिकारी अविशांत पांडा, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, आणि जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सुजाता सौनिक यांनी तंत्रज्ञानाचा वापर वाढवून प्रशासनाला अधिक वेगवान आणि प्रभावी बनवण्यावर भर दिला. गडचिरोलीला डिजिटल जिल्हा म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट त्यांनी व्यक्त केले.
त्यांनी शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा पॅनेल लावून ऊर्जा बचतीची मॉडेल तयार करण्याचे आदेश दिले. कृषी क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी एकापेक्षा जास्त पिके घेण्याचा सल्ला दिला. याशिवाय, फळझाड लागवडीला प्रोत्साहन देऊन पर्यावरण संवर्धन व शेती उत्पन्न वाढवण्याच्या योजनांवरही चर्चा झाली.
या बैठकीत जिल्ह्यातील विकासाला गती देण्यासाठी आणि शासकीय यंत्रणांना अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी उपयुक्त सूचना करण्यात आल्या.




