1 डिसेंबर रोजी औरंगाबाद खंडपीठ येथेही आयोजन
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर येथे 30 नोव्हेंबर 2024 रोजी तसेच औरंगाबाद खंडपीठ येथे 1 डिसेंबर 2024 रोजी विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष लोक अदालतीमध्ये उच्च न्यायालयात प्रलंबित असलेले प्रकरणे तडजोडीसाठी ठेवले जाणार आहेत. चंद्रपूर जिल्हयातील पक्षकारांची प्रकरणे उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे प्रलंबित असल्यास व ती तडजोडीने मिटावी, अशी इच्छा असल्यास ते प्रकरण विशेष लोक अदालतीमध्ये ठेवता येऊ शकते. विशेष लोक अदालतीमध्ये पक्षकार प्रत्यक्ष किंवा आभासी पद्धतीने सहभाग घेवू शकतात.
विशेष लोक अदालतीचे फायदे :
साध्या व सोप्या पद्धतीने वाद मिटवता येतो. झालेल्या तडजोडीचा निवाडा अंतिम व अंमलबजावणी होऊ शकणारा असतो. वेळेची व पैशाची बचत होते. तडजोड झाल्यास न्यायालयीन शुल्क परत मिळते.
चंद्रपूर जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, विशेष लोक अदालतीमध्ये प्रकरणे ठेवण्यासाठी संबंधित वकिलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहिती हवी असल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर किंवा संबंधीत तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृध्दी भीष्म यांनी केले आहे.