जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश
परभणी : सतत तीन दिवस झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात जवळपास सर्वच मंडळात अतिवृष्टी झाली असून पाण्याखाली गेलेल्या पिकासह शेतातील मातीही खरडून गेली आहे. अशा सर्व ठिकाणचे तातडीने पंचनामे करावेत. यामध्ये एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले.
कृषिमंत्री मुंडे परभणी जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी परभणी तालुक्यातील काष्टगाव, मानवत तालुक्यातील कोल्हा, सेलू तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव, पाथरी तालुक्यातील रेणापूर, बोरगव्हाण, खेर्डा परिसरातील नुकसान झालेल्या स्थळी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करत स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी खासदार संजय जाधव, आमदार राजेश विटेकर, सुरेश वडपूरकर, मेघना बोर्डीकर, विभागीय कृषि सह संचालक रावसाहेब दिवेकर, उपविभागीय अधिकारी संगीता सानप, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दौलत चव्हाण, उपविभागीय कृषि अधिकारी रवि हरणे, यासह महसूल, कृषी व विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पूर्णपणे मोबदला मदतीच्या स्वरूपात राज्य शासनाकडून मिळेल. तसेच जिल्ह्यात पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना प्राथमिक 25 टक्के अग्रीम देण्याचे आदेश विमा कंपनीला देण्यात आले असल्याचे यावेळी धनंजय मुंडे यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीमुळे पिकविमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार करता आली नाही त्यांची ऑफलाईन तक्रार स्विकारण्याचे आदेशही यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. पावसाच्या अतिप्रवाहाने तसेच नदीतील प्रवाहाचे पाणी शेत जमिनींमध्ये घुसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनीमधील माती पूर्णपणे खरडून गेली आहे तसेच जनावरे, शेतीउपयोगी साहित्य वाहून गेले असून त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा सर्व बाधित शेतकऱ्यांचे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषानुसार स्वतंत्र पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. परभणी जिल्ह्यात सर्व महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. याबाबत कॅबिनेटमध्ये निर्णय घेवून शेतकऱ्यांना लवकरात लवकर पूर्णपणे मदत दिली जाईल, असेही आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिले.
कृषिमंत्री मुंडे यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी आदींना तात्काळ पंचनामे सुरू करून मदतीचे अहवाल राज्य शासनाकडे शक्य तितक्या लवकर पाठवावेत, असे निर्देश दिले आहेत. यावेळी परभणी जिल्ह्यातील थकित पीक विम्याचेही तातडीने वितरण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत.