भूम येथे जनता दरबार
धाराशिव : भूम तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. समस्याग्रस्त नागरिकांच्या प्रश्नांची सोडून करणे हे यंत्रणेची काम आहे. त्यांच्या समस्यांची सोडवणूक करून त्यांना न्याय देणे हे यंत्रणांचे कर्तव्य असून आजच्या जनता दरबारात अर्ज घेऊन आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या समस्यांची सोडून तातडीने करावी. असे निर्देश पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिले.
16 ऑगस्ट रोजी भूम येथे येथील तहसील कार्यालयात आयोजित जनता दरबारात अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री प्रा.डॉ. सावंत बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलिस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, बाळासाहेब हळउमरीकर, बालाजी गुंजाळ, जिल्हा परिषदेचे माजी कृषी समिती सभापती अण्णासाहेब देशमुख व बाळासाहेब क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत म्हणाले, जनता दरबार या कार्यक्रमातून नागरिकांच्या समस्या जागेवरच सोडविण्यात येत आहे. अर्ज करणारा नागरिक आणि संबंधित विभागाचे अधिकारी हे प्रत्यक्ष उपस्थित राहत असल्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना एक ते दोन दिवसात त्या अर्जावर कार्यवाही करण्याबाबत पालकमंत्री या नात्याने निर्देश देण्यात येत असल्यामुळे संबंधितांच्या अर्जावर तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे. तालुक्यात ज्या गायरान जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे, त्यावरील अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे. अतिक्रमणामुळे कुठेही रहदारीला अडथळा निर्माण झाला असेल तर ते अतिक्रमण प्राधान्याने काढण्यात यावे, असे ते म्हणाले.
भूम तालुक्यात आजच्या जनता दरबारात शेतकऱ्यांच्या वीज वितरण कंपनीबाबतचे अर्ज मोठ्या संख्येने असल्याचे सांगून प्रा.डॉ.सावंत म्हणाले, वीज वितरण कंपनीने संबंधित शेतकऱ्यांना तातडीने वीज कनेक्शन व डीपी उपलब्ध करून द्यावी. कुणालाही चुकीचे बील दिले जाणार नाही याची दक्षता वीज वितरण कंपनीने घ्यावी. राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या देखील तक्रारी नागरिकांनी या जनता दरबारात केल्या आहे, ज्या बसेस ज्या मार्गावर सुरू होत्या, त्या आता बंद केल्याने प्रवाशांची व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे, त्यामुळे विभाग नियंत्रकाने या मार्गावरील बसेस पूर्ववत सुरू कराव्यात. ज्या गावातील नागरिकांनी बस सुरू करण्याची मागणी आपल्या अर्जात केली आहे, त्या मार्गावर येत्या एक-दोन दिवसात बसेस सुरू कराव्यात. बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे शेतकऱ्यांच्या अर्जावरून दिसून येत आहे. तेव्हा पीक कर्ज व अनुदानाबाबत बँक, जिल्हा उपनिबंधक आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेऊन संबंधित शेतकऱ्यांची ही समस्या सोडविण्यात येईल अशी त्यांनी सांगितले.
ज्या गावांमध्ये दहनशेड नाही, अशा गावांमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर काही गावात जागा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगून प्रा.डॉ.सावंत म्हणाले की, दहनभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्मशानभूमीचे सातबारा तातडीने तयार करण्यात यावे.जनता दरबारात नागरिकांच्या सर्व अर्जांची संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन येत्या दोन दिवसात कार्यवाही करून तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
जनता दरबारात तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांनी विविध यंत्रणांशी संबंधित असलेल्या समस्यांचे व तक्रारींचे अर्ज दिले. यावेळी पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांनी प्रत्येक अर्जदाराच्या अर्जाची बारकाईने पाहणी करून अर्जदाराशी अर्जाबाबत व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून ती तातडीने निकाली काढण्याबाबत निर्देशही यावेळी त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.
जनता दरबारात भूम तालुक्यातील प्रमोद शेळके, विजय कावळे, अनिता कडकोटे, अच्युत आठवले, बाजीराव कसबे, संदीप सपकाळ, बालाजी कुटे, दिलीप गरड, पोपटराव चौधरी, कैलास चंदनशिवे, दत्तात्रय काळे, सुरेखा बनसोडे, शिवाजी सुतार, प्रवीण खांडेकर, अभिमान जाधवर, प्रभू मदने, संजय हाडे, रेखा गणगे, अनिता पांढरे, सुभाष सावळे, रामलिंग उंबरे, उमेश दुरूंदे, महादेव कुटे, नवनाथ सुरवसे, किसन चौधरी, निलेश शिंदे, सिद्धेश्वर जगदाळे, अभिजीत महाजन, अर्चना दराडे, ईश्वर दिसले, मच्छिंद्र वरडे, अरुण झांबरे यांच्यासह अनेक नागरिकांनी या जनता दरबारात आपलया विविध समस्या सोडवणुकीसाठी अर्ज दाखल केले होते.
आजच्या या जनता दरबाराला जिल्हास्तरीयंत्रणांचे प्रमुख अधिकारी तसेच तालुकास्तरीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.