क्रांतिदिनामित्त चंद्रपूर मनपातर्फे हुतात्म्यांना अभिवादन
चंद्रपूर : ऑगस्ट क्रांतिदिनामित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या हुतात्म्यांना चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ९ ऑगस्ट रोजी हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. मनपा अतिरीक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या हस्ते हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात येऊन ध्वजारोहण करण्यात आले.
याचप्रसंगी केंद्र आणि राज्य शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानाचा चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये थाटात शुभारंभ झाला. अभियानांतर्गत महानगरपालिकेत ‘तिरंगा प्रतिज्ञा’ घेण्यात आली. उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांना ‘तिरंगा शपथ’ देण्यात आली. याप्रसंगी डॉ.आंबेडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शिक्षक व विद्यार्थ्यांतर्फे ‘क्रांती दिन अभिवादन रॅली’ काढण्यात आली.
क्रांतिदिनाचे औचित्य साधून उपायुक्त रवींद्र भेलावे यांनी क्रांतीची धगधगती मशाल हातात घेऊन देशात स्वातंत्र्याचा प्रकाश आणण्यासाठी ज्या हजारो हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली, अशा अमर हुतात्म्यांचा स्मृतीदिनाचे महत्व विषद केले, तर उपायुक्त मंगेश खवले यांनी ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविल्या जाणाऱ्या हर घर तिरंगा मोहीमेअंतर्गत मनपातर्फे केल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमात विशेष कॅनव्हॉस ठेवण्यात आला होता ज्यावर सर्व उपस्थीतांनी हर घर तिरंगा व वंदे मातरम लिहिले.सर्व उपस्थीतांच्या हातात तिरंगा ध्वज असल्याने वातावरण चैतन्यमय झाले होते.
कार्यक्रमास शहर अभियंता विजय बोरीकर, लेखाधिकारी मनोहर बागडे, सहायक आयुक्त नरेंद्र बोभाटे, संतोष गर्गेलवार, सचिन माकोडे, विधी अधिकारी अनिल घुले, उपअभियंता रवींद्र हजारे, डॉ.नयना उत्तरवार, डॉ.अमोल शेळके, चैतन्य चोरे, नागेश नित, विकास दानव, गुरुदास नवले, आशिष जिवतोडे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी तसेच पालिकेतील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




