मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या
मुंबई : आजचा दिवस उत्साहाचा असून विघ्नहर्ता गणरायाचे सर्वत्र आगमन झाले आहे. गेल्या वर्षी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा झाला होता. या वर्षी देखील गणेशोत्सव उत्साह आणि आनंदात साजरा होत आहे. जी सार्वजनिक गणेश मंडळे नियमानुसार गणेशोत्सव साजरा करतात त्यांना सरसकट पाच वर्षांसाठी परवानगी द्यावी, मंडपासाठी शुल्क आकारणी करु नये अशा सूचना प्रशासनाला दिल्यामुळे गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आजपासून संसदेचे कामकाज नवीन संसद भवनात होणार असून याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. भारताचे नाव जगभरात उज्वल होत असून तो लौकिक अजून वाढविण्यासाठी गणपती बाप्पा प्रधानमंत्री मोदी यांना बळ देतील, आशिर्वाद देतील असा विश्वास व्यक्त करुन मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्या जनहिताच्या विविध निर्णयांचे स्वागत केले.
हे शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे सरकार आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना नियम बाजूला ठेवून मदत केली. मदतीची रक्कम दुप्पट मदत केली. शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजाराची मदत, एक रुपयात पिकविमा दिला आहे. संकटकाळात शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.