अहिल्यानगर : दि. 31 मे रोजी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अहिल्यानगर शहरातील विविध भागांमध्ये झाडे उन्मळून पडणे, विद्युत तारा तुटणे आणि वाहतुकीस अडथळे निर्माण होण्याच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभाग, उद्यान विभाग, विद्युत विभाग तसेच इतर संबंधित आपत्कालीन यंत्रणांनी तात्काळ प्रतिसाद देत युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेतले.
महापालिकेच्या पथकांनी राधाबाई काळे रोड, जुनी मनपा परिसर, अशोका हॉटेल ब्रिजजवळील पेट्रोल पंप परिसर, रामवाडी, नशीबन कॉलनी रोड, समर्थ नगर, वृंदावन कॉलनी, पारिजात चौक, पाईपलाईन रोड (यशोदा नगरसमोर), झरेकर गल्ली, आयुर्वेद महाविद्यालय परिसर, भिस्त गल्ली, भाऊसाहेब फिरोदिया गेट परिसर, सर्जेपुरा रंगभवन, अमरधाम, समर्थ शाळा परिसर, हॉटेल सायंतारा परिसर तसेच सिद्धीदाता कॉलनी (प्रोफेसर चौक) आदी ठिकाणी तातडीने कार्यवाही केली.
या मोहिमेदरम्यान पडलेली झाडे व फांद्या हटविणे, तुटलेल्या विद्युत तारा आणि कंडक्टरची दुरुस्ती करणे, बंद पडलेले रस्ते वाहतुकीसाठी खुले करणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात आल्या.
वृंदावन कॉलनी येथे झाड कोसळल्याने घरात अडकलेल्या नागरिकांना महापालिकेच्या पथकाने सुखरूप बाहेर काढले. तसेच सिद्धीदाता कॉलनी, प्रोफेसर चौक येथे पडलेल्या झाडामुळे बंद झालेला रस्ता पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
महानगरपालिकेचे सर्व विभाग परस्पर समन्वयाने कार्यरत असून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी सदैव सज्ज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तसेच झाड पडणे, विद्युत तारा तुटणे, आग, पाणीपुरवठा किंवा इतर नागरी समस्यांबाबत तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आपत्कालीन संपर्क क्रमांकांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




