जिल्ह्यात रेशीम उद्योग वाढीसाठी प्रयत्न करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर : जिल्ह्यात रेशीम शेती आणि उद्योगासाठी मोठी संधी उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना रेशीम शेतीचे महत्त्व व त्यातून मिळणारे शाश्वत उत्पन्न याची माहिती व्हावी यासाठी महारेशीम अभियान-२०२५ राबविण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.
९ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत महारेशीम अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. हिरवा झेंडा दाखवून अभियान रथ रवाना करण्यात आला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी राजेश कांबळे, प्रगतशील रेशीम उत्पादक शेतकरी तानाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
रेशीम शेतीसाठी ७५० एकरचा लक्षांक
रेशीम उद्योगाचा विस्तार करण्यासाठी रेशीम विभागासाठी २५० एकर, कृषी विभागासाठी ३०० एकर आणि जिल्हा परिषदेसाठी २०० एकर अशा एकूण ७५० एकरचा उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. संबंधित विभागांनी हे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत रेशीम शेती
रेशीम शेतीसाठी तुती लागवड व कीटक संगोपन गृहासाठी लाभार्थ्यांना ८९५ दिवसांचे काम व मजुरी प्रदान केली जाते. यासाठी ४ लाख १८ हजार ८१५ रुपयांचे अनुदान दिले जाते. लाभार्थ्यांमध्ये अनुसूचित जाती-जमाती, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे, महिला प्रधान कुटुंबे, तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांचा समावेश केला जातो.
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न
रेशीम शेतीद्वारे एकरी वार्षिक १ लाख ५० हजार रुपये उत्पन्न मिळू शकते. इच्छुक शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी राजेश कांबळे यांनी केले.




