जिवती (चंद्रपुर) : लोकशाहीर साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीच्या निमित्ताने व सुप्रीम कोर्टाने १ ऑगस्ट २०२४ रोजी दिलेल्या उपवर्गीकरण निर्णयाच्या समर्थनार्थ ३१ ऑगस्ट ला भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी तालुक्यातील समाजबांधव, महिला, युवक, युवती, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण शहरात सुप्रीम कोर्टाने उपवर्गीकरणाच्या संदर्भात दिलेल्या निर्णयाचे समर्थन करणारे फलक हातात घेऊन भव्य रॅली काढण्यात आली. रॅली तहसील कार्यालयापर्यंत नेण्यात आली व तिथे तहसीलदार अविनाश शेंबटवाड यांना निवेदन देण्यात आले.
त्यानंतर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात रॅली समाप्त होऊन मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंढरी गायकवाड, उदघाटक अरुण धोटे तर सत्कारमूर्ती खासदार प्रतिभा धानोरकर या उपस्थित होत्या. यावेळी मातंग समाज जयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांचे जंगी स्वागत केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून भगवान डुकरे, सुग्रीव गोतावळे नरसिंग मोरे, पंढरी सूर्यवंशी, अरविंद कलवले, वाघमारे, शांताबाई मोतेवाड, पार्वताबाई गवाले, सुमनबाई शेळके, जयश्री गोतावळे, सुनीता नामवाड, पंढरी काकडे, यादव वाघमारे, गुणवंत कांबळे शाहीर तुकाराम जाधव, लक्ष्मण आकृपे, प्रल्हाद मदने आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.अंकुश गोतावळे राज्य -समन्वयक, ऍड.दत्तराज गायकवाड- लोकस्वराज्य आंदोलन, जी.एस. कांबळे -ज्येष्ठ विचारवंत यांनी सखोल मार्गदर्शन केले.
डॉ.अंकुश गोतावळे यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे समाजाच्या वतीने स्वागत करताना हा निर्णय म्हणजे स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर अनुसूचित जातीतील ५८ जातींचा आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, असमतोल दूर करण्यासाठीचा योग्य उपाय म्हणून ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाने या दबलेल्या उपेक्षित असणाऱ्या घटकांना योग्य तो न्याय मिळणार असल्याचे त्यांनी नमूद करून या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने कामाला लागावे अशी सूचना केली.
सत्कारमूर्ती प्रतिभा धानोरकर यांनी सत्काराला उत्तर देताना, मातंग समाजा पूर्वीपासून अण्णाभाऊंच्या विचारांचा व महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपणारा, प्रामाणिक आणि शब्द पाळणारा समाज असून या समाजास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी माझ्या स्तरावर जे जे विषय येतील ते ते विषय मी लोकसभेच्या सभागृहात मांडून मातंग समाजाला न्याय मिळवून देणे हे माझे कर्तव्य असून मी नक्कीच कर्तव्यपूर्ती करणार असे आश्वासन दिले. या मतदारसंघात मला लोकांनी संधी दिल्यामुळे मी नक्कीच सामान्य नागरिकांचे असलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भानुदास जाधव यांनी सूत्रसंचालन देविदास कांबळे यांनी तर आभार गजानन गायकवाड यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्ताजी तोगरे, दत्ताजी गायकवाड, विजय गोतावळे, विजय कांबळे, व्यंकटी तोगरे, नवनाथ जांभळे, केशव भालेराव, मारुती मोरे, यादव भालेराव, पांडुरंग भालेराव, बालाजी वाघमारे, शांतकुमार गोरे, दीपक गोतावळे, रणजीत सूर्यवंशी, अजय नरहरे, गोविंद वाघमारे, विधान गोतावळे, जयंत गोतावळे, मारुती कांबळे, संभाजी गायकवाड, चंद्रभान केदासे, राजकुमार गोपले, काशिनाथ कोंबले, किशोर तोगरे, किसन पट्टेवाले, आनंद गोतावळे, ज्ञानेश्वर गायकवाड व मातंग समाज जयंती उत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.




