चंद्रपूर : राज्य सरकारच्या 19 मार्च 2025 च्या शासन निर्णयानुसार सावली तालुक्यात ‘जिवंत सातबारा’ मोहीम राबविण्यात येत आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या मोहिमेअंतर्गत मृत खातेदारांचे वारस दाखल करून सातबाराची नोंद अद्ययावत केली जाणार आहे.
1 ते 5 एप्रिल दरम्यान गावांमध्ये तलाठ्यांच्या चावडी वाचन प्रक्रियेत नागरिकांनी मय्यत खातेदारांची माहिती द्यावी. त्यानंतर 6 ते 20 एप्रिल या कालावधीत वारसदारांनी मृत्यू दाखला, सत्य प्रतिज्ञापत्र, घोषणा पत्र, सरपंच/ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र, वारसांची यादी आणि इतर आवश्यक कागदपत्रे तलाठ्यांकडे जमा करावीत.
21 एप्रिल ते 10 मे या कालावधीत तलाठी फेरफार करून मय्यत खातेदारांची नावे सातबारावरून कमी करून वारसांची नोंद करतील.
सर्व शेतकरी बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सावलीच्या तहसीलदार प्रांजली चिरडे यांनी केले आहे.