बारामती : असे शरद पवार म्हणाले मी विचार करत होतो किती वर्षांनी मी इथे आलो? माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात १९६५ पासून झाली. नुकताच मी कॉलेजमधून बाहेर पडलो आणि भागामध्ये काम करावं अशा प्रकारची इच्छा होती. सुरुवात केली ती जिरायत भागापासून. ४-२ लोक दिसतायत मला इथं त्या काळातले. कुठेही गेलो तर एक गोष्ट ऐकायला मिळायची दुष्काळ! या सबंध जिरायत भागाचं आणि दुष्काळाचं काही नातं होतं. पाऊस ६-७ इंच पडायचा. तो पडल्यानंतर पाणी वाहून जायचं, शेतीवर परिणाम होत नव्हता. तेव्हा आम्ही असा विचार केला की पाणी थांबवलं तर काय होईल? पाणी साठवलं तर काय होईल? पाणी साठवलं तर आजूबाजूच्या विहिरीच्या पाण्याची पातळी वाढेल. काहीतरी मदत लोकांना होईल, ती कशी देता येईल याचा विचार केला पाहिजे.
त्यावेळेला बारामतीला एक ऑस्ट्रेलियन संस्था काम करत होती. त्या देशामध्ये गहू खूप तयार होतो आणि माझ्या वाचनामध्ये आलं की जिथं अडचण असेल त्याठिकाणी गहू द्यायचा त्यांचा धोरण आहे. ही गहू मंजूर करणारी संस्था दिल्लीमध्ये होती. मी दिल्लीमध्ये गेलो, त्यांच्याशी वाटाघाटी केल्या. त्यांनी मिशनचा आधार दिला आणि गहू द्यायला सुरुवात केली. तुम्हा लोकांना नव्या पिढीला माहीत नसेल, जुन्या लोकांना माहीत आहे. दुष्काळ पडल्यानंतर त्यावेळेला सरकार आपल्याला मिल द्यायचं. आठवतंय का कुणाला? आमच्या जनतेने लाल भाकरी खाल्ली पर्याय नव्हता. गहू कसा आणता येईल, हा प्रयत्न आम्ही लोकांनी केला, त्याला मान्यता मिळाली आणि गावोगाव दुष्काळी काम करायला सुरुवात केली व ठिकठिकाणी बंधारे, पाझर तलाव यांची निर्मिती केली.
दुष्काळी भागामध्ये जवळपास ३०० तलाव तयार झाले, जे काही पाणी पडेल ते साठवलं गेलं. ते १०० टक्के बागायत झालं नाही. पण ४ आणि ३ बागायत झालं आणि लोकांना एक प्रकारे जगायचं साधन मिळालं. त्या काळामध्ये माझं जाणं येणं इथे जास्त असायचं. सदाशिवराव सातव आज या ठिकाणी आहेत, त्यांचे वडील हे माझ्याबरोबर असायचे. मला माहीत नाही नक्की पण त्यांचं काहीतरी नातं-गोतं या गावात आहे, त्यामुळे त्यांचा परिचय असायचा. मला आठवतंय की एके दिवशी गावकऱ्यांनी सांगितलं इथे एक हायस्कुल काढायची. मी म्हणालो काढूया काही हरकत नाही. मला म्हणले तुम्ही अध्यक्ष व्हा! मी म्हणालो मी कधी येणार? नाय म्हटले तुमचं नाव फक्त असुद्या. भैरवनाथ शिक्षण मंडळ, अध्यक्ष. शिक्षण संस्थेच्या वतीने संस्था तुम्हा लोकांनी उभी केली, गावच्या सगळ्या लोकांनी मदत केली. इतके वर्षे ज्ञान दानाचं काम या ठिकाणी सुरु आहे, त्याचे शंभर टक्के श्रेय गावच्या लोकांना आहे.
बारामतीच्या उंडवडी कडेपठार येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
सन्माननीय व्यासपीठ आणि सहकारी बंधू-भगिनींनो..!
मी विचार करत होतो किती वर्षांनी मी इथे आलो? माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात १९६५ पासून झाली. नुकताच मी कॉलेजमधून बाहेर पडलो आणि भागामध्ये काम करावं अशा प्रकारची इच्छा… pic.twitter.com/w9Em2x72BQ
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 8, 2024
नंतरच्या काळामध्ये मला स्वतःला तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये १९६७ साली पाठवलं. नंतर राज्यात स्थिती बदलली. कधी मंत्री झालो, कधी मुख्यमंत्री झालो, केंद्र सरकारमध्ये गेलो, देशाच्या संरक्षण खात्याचं काम झालं आणि मला आनंद झाला शेवटचे दहा वर्षे शेती मंत्री झालो. मला आठवतंय त्यावेळचे प्रधानमंत्री त्यांचे नाव मनमोहन सिंग. निवडणूक झाल्यानंतर ते माझ्याकडे आले आणि मला म्हटले तुम्ही मंत्री मंडळात यावं. कोणतं खातं पाहिजे? मी म्हटलं कोणतं देता? ते म्हटले गृह खातं, अर्थ खातं, परराष्ट्र खातं तुम्हाला काय हवंय ते घ्या. मी म्हटलं यातलं मला काही नको. म्हटले मग काय हवंय तुम्हाला? मी म्हटलं मला शेती पाहिजे, ते कुणी घेत नाही ते मी घेतो. दहा वर्षे शेतीचं काम माझ्याकडे आलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, शपथ घेतली घरी आलो आणि माझ्यापुढे पहिली फाईल आली की, देशामध्ये अन्नधान्याचे जे साठे आहे ते दिड महिना पुरेल इतकंच आहे आणि परिस्थिती गंभीर आहे, परदेशातून धान्य आणावं लागेल. माझी इच्छा नव्हती शेतीप्रधान देश म्हणायचा आणि परदेशातून धान्य आणायचं मला ते अजिबात पटत नव्हतं. मी काही सही केली नाही. मनमोहन सिंग यांनी दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं की, पवार साहेब देशाच्या गोदामात माल किती आहे ते एकदा बघा मग तुम्हाला कळेल की सही कशी केली पाहिजे. ती माहिती घेतल्यानंतर नाईलाजाने परदेशातून धान्य आणावं लागलं. पण ठरवलं की हे बंद केलं पाहिजे.
ज्या दिवशी २०१४ साली मी सरकारमधून थांबायचं ठरवलं, शेती खातं सोडलं त्या दिवशीची अवस्था काय होती? मंत्री झालो त्यावेळेला परदेशातून धान्य आणलं, मंत्री पद सोडलं त्यावेळेला जगातल्या १८ देशांना धान्य द्यायला लागलो. हे कोणी केलं? या देशातल्या शेतकऱ्यांनी केलं. का केलं? त्याला चांगली किंमत मिळाली, त्याचं जे काही कर्जाचं ओझं होतं ७१ हजार कोटींचे कर्ज एकमताने माफ केलं, व्याजाचे दर कमी केले, नवीन बी- बियाणे दिले या सर्व गोष्टींमुळे हा देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. याच्याइतका आनंद माझ्यासारख्याला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा नाही, चित्र बदललं.




