आवळगाव (ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर) : येथे वाघाच्या हल्यात मृत्युमुखी पडलेले श्री. मनोहर सखाराम चौधरी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्यात आले. घरातील कर्ता व्यक्ती गमावल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुटुंबाला तातडीने आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासनाच्या विविध योजनांद्वारे अधिकाधिक सहाय्य मिळवून देण्यासाठी पूर्ण सहकार्य दिले जाणार असून, कुटुंबासाठी एक खंबीर आधार उभा केला जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
दरम्यान, वाघांच्या वाढत्या संख्येमुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मानवी-वन्यजीव संघर्ष अधिकच तीव्र होत चालला आहे. शेतकरी, मजूर आणि आदिवासी बांधवांचे जीव या संघर्षात जात असल्याने ही बाब अतिशय गंभीर बनली आहे. नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या विषयावर लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. सभागृहात जिल्ह्यांतील परिस्थितीची गंभीरता अधोरेखित केली असली तरी, सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, ही खेदजनक बाब आहे.
या पार्श्वभूमीवर आता या प्रश्नावर तातडीने आणि ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. मानवी जीवांचे संरक्षण करतानाच वन्यजीवांचेही संतुलन राखणारी शाश्वत उपाययोजना लवकरात लवकर राबविणे अत्यावश्यक ठरत आहे.




