चंद्रपूर | चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारार्थ ‘विजय संकल्प यात्रा’ काढली. या यात्रेमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या प्रसंगी मंत्री डॉ. अशोक उईके, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार कीर्तीकुमार (बंटी) भांगडिया, आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधत विकासकामांचा आढावा घेतला तसेच महानगरपालिकेमध्ये सक्षम, स्थिर व विकासाभिमुख नेतृत्व देण्याचा निर्धार व्यक्त केला. ‘विजय संकल्प यात्रा’द्वारे भाजपाचा विकासाचा अजेंडा घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यात्रेदरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी मुख्यमंत्री व उपस्थित नेत्यांचे स्वागत केले. ढोल-ताशे, घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसरात उत्साही वातावरण निर्माण झाले.




