(प्रणयकुमार बंडी)
घुग्घुस, चंद्रपूर : अमराई वॉर्डातील भूस्खलनग्रस्तांना न्याय मिळावा व पुनर्वसनाची मागणी मान्य करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आज तिसरा दिवस झाला आहे. सोमवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी शिवसेनेच्या झेंड्याखाली जिल्हाप्रमुखांवर विश्वास ठेवून पाच महिला प्रमोद महाजन मंच, नगरपरिषद कार्यालयाजवळ आमरण उपोषणाला बसल्या होत्या.
तीन दिवसांनंतर, गुरुवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी या पाच महिलांपैकी दोन महिलांची प्रकृती खूपच खालावल्याची माहिती समोर आली आहे. वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांनी या दोघींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र “१६८ कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही,” असा ठाम निर्धार उपोषणकर्त्या महिलांनी व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उ.बा.ठा) शहर संघटक अमित बोरकर यांनी इशारा दिला आहे की, “उपोषणकर्त्या महिलांच्या प्रकृतीत अधिक बिघाड झाल्यास किंवा काही अनर्थ घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाचीच राहील.”
अमराई वॉर्डातील भूस्खलनग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरू असलेले हे आमरण उपोषण अधिक तीव्र होत असून, स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून या आंदोलनाला मोठे समर्थन मिळत आहे.




