चंद्रपूर : विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विशेषतः चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रगतीसाठी दिवंगत खासदार बाळु धानोरकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर मोठे यश मिळाले आहे. त्यांची दीर्घकालीन मागणी असलेल्या वर्धा ते बल्लारशाह चौथ्या रेल्वे लाईनला केंद्रीय मंत्रिमंडळाने २८ मे रोजी मंजुरी दिली असून, यामुळे संपूर्ण परिसरातील वाहतूक कोंडी सुटून औद्योगिक विकासाला गती मिळणार आहे.
दिवंगत खासदार बाळु धानोरकर यांनी आपल्या कार्यकाळात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी अनेक वेळा संसदेत आवाज उठवला होता. दिल्ली-चेन्नई उच्च घनता कॉरिडॉरवरील ताण कमी करणे, प्रवासी आणि मालवाहतूक अधिक वेगवान करणे, हा त्यांच्या मागणीचा मुख्य हेतू होता. आज त्यांच्या दूरदृष्टी आणि चिकाटीच्या कार्याला केंद्र सरकारने मान्यता देत ही चौथी रेल्वे लाईन मंजूर केली आहे.
या प्रकल्पाअंतर्गत वर्धा ते बल्लारशाह दरम्यान सुमारे १३४.५२ किमी लांबीची चौथी रेल्वे लाईन टाकण्यात येणार असून, यासाठी ३,३९९ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च होणार आहे. हा प्रकल्प २०२९-३० पर्यंत पूर्ण होण्याचे उद्दिष्ट आहे.
या लाईनमुळे कोळसा, सिमेंट, जिप्सम, फ्लाय ऍश, कंटेनर्स, कृषी उत्पादने व पेट्रोलियम यांसारख्या महत्त्वाच्या वस्तूंची वाहतूक अधिक जलद आणि प्रभावी होणार आहे. याचा थेट फायदा विदर्भातील औद्योगिक प्रगतीस होईल.
वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांतील अनेक गावांना या रेल्वे लाईनमुळे उत्तम कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. हा प्रकल्प पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत राबविण्यात येणार असून, देशातील मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटीला चालना मिळेल.
दिवंगत बाळु धानोरकर यांच्या कार्याला ही एक मोठी पावती मानली जात असून, त्यांच्या स्वप्नातील विदर्भाच्या विकासदृष्टीला नवी दिशा मिळाल्याचे अनेक सहकाऱ्यांचे आणि नागरिकांचे म्हणणे आहे. बाळु धानोरकर मित्र परिवार व स्थानिक जनतेने या निर्णयाचे जल्लोषात स्वागत केले आहे.




